वाकड, प्रतिनिधी :
वाकड गावठाण येथील स्मशानभूमीजवळून वाहणाऱ्या मूळा नदीतील वाढते प्रदूषण, साचलेली जलपर्णी आणि गाळ यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नदीची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी लोकहीतवादी सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक अजिंक्य विजय (आप्पा) वाघमारे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेच्या दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वाकड गावठाण स्मशानभूमीजवळील मूळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली असून गाळाचा थरही वाढला आहे. त्यामुळे नदीचे पाणी अत्यंत दूषित झाले असून परिसरात गटारापेक्षाही तीव्र दुर्गंधी पसरत आहे.
या दूषित परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून डासांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया तसेच इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अजिंक्य विजय (आप्पा) वाघमारे यांनी महापालिकेकडे नदीपात्रातील जलपर्णी, गाळ व कचरा तातडीने हटवून मूळा नदीची स्वच्छता करण्याची तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी नियमित स्वच्छता व देखभाल व्यवस्था राबविण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या गंभीर समस्येकडे महापालिकेने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष – धर्मराज बनसोडे, राज्य सचिव – विशाल वाघमारे, अतिश दुधावडे, अनिल मुळवाड, ऋषिकेश वाघमारे, इत्यादी संस्थेचे पदाधिकारी उपस्तिथ होते.


