
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरात ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः पवनानगर व रहाटणी परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
या कठीण परिस्थितीत सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई काटे यांनी मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत त्या स्वतः रस्त्यावर उतरल्या आणि नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेल्या. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदत करणे, सुरक्षित मार्गदर्शन करणे तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांची काळजी घेणे अशा विविध माध्यमांतून त्यांनी मदतकार्य केले.
याचवेळी रेखाताई काटे यांनी परिसरातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोठ्या प्रमाणात साड्यांचे वाटप केले. पावसाच्या संकटातही समाजातील वंचित घटकांना आधार देण्याचा त्यांचा हा उपक्रम नागरिकांच्या मनाला स्पर्श करून गेला.
रेखाताई काटे यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले आहे. संकटाच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाणे हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.


