चिखली, प्रतिनिधी : आर्थिक अडचणी, मोठ्या कुटुंबाची जबाबदारी आणि अनेक संकटांशी दोन हात करत शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या ऋतुजा आरणे हिची यशोगाथा आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थितीने वारंवार परीक्षा घेतली, मात्र जिद्द, चिकाटी आणि आई-वडिलांच्या त्यागाच्या बळावर तिने आपली स्वप्ने जिवंत ठेवली.
आई – वडिल, चार बहिणी आणि एक भाऊ आशा मोठ्या कुटुंबात वाढलेल्या ऋतुजाच्या आयुष्यात सुखसोयींपेक्षा संघर्षच अधिक होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तिचे वडील पोपट आरणे यांनी दिवसरात्र मेहनत घेतली, तर आई रेखा आरणे यांनी संसाराची जबाबदारी सांभाळत मुलांच्या शिक्षणाला कधीही खंड पडू दिला नाही. अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, पण मुलांनी शिकावे, मोठे व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, हेच त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न होते.
ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालवाडीतून सुरू झाले. त्यानंतर विविध शाळांमध्ये शिक्षण घेत तिने बारावीपर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. शिक्षणासोबतच तिने चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, शिवणकाम आणि इतर कौशल्यांमध्येही प्राविण्य मिळवले. घरातील जबाबदाऱ्या सांभाळत आणि अनेक अडथळ्यांवर मात करत तिने आपले शिक्षण सुरू ठेवले.
पालकांच्या त्यागाची जाणीव मनात ठेवून ऋतुजाने प्रत्येक संधीचे सोने केले. तिच्या मेहनतीचा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा प्रभाव तिच्या भावंडांवरही पडला असून त्यांनीही शिक्षणाच्या वाटेवर यशस्वी पावले टाकली आहेत.
आज ऋतुजाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे ध्येय निश्चित केले आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करणे आणि समाजासाठी काम करणारी अधिकारी बनणे, हेच तिचे स्वप्न आहे.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे ऋतुजा आरणे. तिचा संघर्ष आणि यशाचा प्रवास अनेक युवक-युवतींना नवी प्रेरणा देणारा ठरत आहे.


